मुंबई – शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत पक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर आली. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच समोर येऊन प्रतिक्रिया देत आहे. उद्धव ठाकरे फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असून सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत आहे. जर माझ्याच लोकांना माझ्यावर विश्वास नसेल तर काय करायचं?, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
आज संध्याकाळी मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलताना केली आहे. तर मी माझ्या राजीनाम्याचं पत्रक तयार ठेवलं असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, मी माझं मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार आहे. मात्र, तुम्ही फक्त माझ्यासमोर येऊन बोला किंवा फोन तरी करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.