BREAKING NEWS – मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडलं, राष्ट्रवादीचे मंत्री नाराज, अजित पवारांच्या घरी बैठक
मुंबई विशेष प्रतिनिधी – मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ला जय महाराष्ट्र करुन ‘पुन:श्च मातोश्री’ म्हणत शिवसैनिकांच्या भक्कम आधारावर आणि कुटुंबाच्या साथीने ‘वर्षा ते मातोश्री’ असा ९ किलो मीटरचा पल्ला जवळपास २ तासांनी पार केला. यादरम्यान शिवसैनिकांचं अफाट प्रेम, महिला कार्यकर्त्यांच्या त्यांच्याप्रती असलेल्या सहृदयी भावना याचं दर्शन ठाकरे कुटुंबाला झालं. पण या साऱ्या शक्तीप्रदर्शनाने तसंच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा सोडण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री नाराज झाले असल्याची माहिती समोर येतीये.
रात्री ९ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा सोडण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करुनही बंडखोर नेते एकनाथ शिंदे माघारी फिरायला तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकिय निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते.
अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीला मंत्री जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या सर्व नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. चर्चेत मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर या सगळ्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडापाठीमागे सेनेतील कुणीतरी आणखी एक नेता आहे, असा संशय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत व्यक्त केला.