
गजरा घातल्यामुळे या अभिनेत्रीला भरावा लागला लाखोंचा दंड
गजरा घालून प्रवास करणं अभिनेत्रीला पडलं महागात, विमानतळवर ठोठावला दंड, अभिनेत्रीसोबत काय घडलं?
सिडनी – भारतीय महिला सजताना अनेक प्रकारचे दागिने घालतात. पण तरीही त्या जोपर्यंत गजरा घालत नाहीत, तोवर त्यांना आपण पूर्ण सजलो आहोत असे वाटत नाही. साधारण एक गजरा जास्तीत जास्त ५० ते १०० रुपयांना असतो, पण एका अभिनेत्रीला तिचा गाजर तब्बल दीड लाखाला पडला आहे.
अभिनेत्री नव्या नायरसोबत गजऱ्यामुळे एक विचित्र प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये या मल्याळम अभिनेत्रीला गजरा घातल्यामुळे १९८० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.१४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अभिनेत्री नव्या नायरही मल्याळी असोसिएशन ऑफ व्हिक्टोरियाने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी मेलबर्नला जात होती. ती म्हणाली की, “मी इथे येण्यापूर्वी, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी मोगऱ्याची फुलं विकत घेतली. त्यांनी ती दोन भागांमध्ये कापली आणि मला दिली. मी पोहोचेपर्यंत फुलं कोमेजून जातील म्हणून त्यांनी मला कोचीहून सिंगापूरला जाताना केसात ती माळण्यास सांगितलं. त्यांनी मला दुसरा माझ्या हँडबॅगमध्ये ठेवण्यास सांगितला जेणेकरून मी सिंगापूरहून पुढील प्रवासात घालू शकेन. मी ते माझ्या कॅरी बॅगमध्ये ठेवले होते, पण मी जे काही केलं ते तेथील कायद्याच्या विरुद्ध असू शकत. ती चूक माझ्याकडून अनावधानाने घडली. १५ सेंटीमीटर गजरा माळण्यासाठी मला आता १९८० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे १ .१ ४ लाख रुपये दंड भरायचा आहे. हा दंड मला २८ दिवसांच्या आत भरायचा आहे. नव्याला माहीत नव्हतं की, अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला फुलं नेणं कायद्याच्या विरोधात आहे. मेलबर्न एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांनी तिची बॅग तपासली, तेव्हा चमेलीची फुलं पाहून त्यांनी तिला थांबवलं आणि लगेच दंड ठोठावला. दरम्यान नव्याने केरळ राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार दोन वेळा मिळवला आहे. तिने मल्याळी सह कन्नड भाषेतील सिनेमात काम केले आहे. तिने २००१ मध्ये दिलीपसोबत इश्तम या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
ऑस्ट्रेलिया हे एक बेट राष्ट्र आहे. त्याची परिसंस्था अतिशय संवेदनशील आहे. येथील सरकार आपल्या शेती, पर्यावरण आणि जैवविविधतेचे बाह्य कीटक, रोग आणि आक्रमक प्रजातींपासून संरक्षण करण्यासाठी कठोर जैवसुरक्षा नियम लागू करते. कारण हे पदार्थ कीटक, रोग आणि जैविकअसंतुलन निर्माण करू शकतात. त्यामुळे नव्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.