
प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण करून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला. कात्रज परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी दोन रिक्षा चालकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेखर गोविंद पुजारी (वय ४९, रा. घुंगरवाली चाळ, संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी कुणाल कांबळे (रा. बिबवेवाडी), एस. मिसाळ ऊर्फ टायगर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक पुजारी हे कात्रज परिसरात थांबले होते. त्यावेळी रिक्षात प्रवासी भरण्यावरून त्यांचा आरोपींशी वाद झाला. वादातून आरोपींनी पुजारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू पुजारी यांच्या डोक्यात घातला. पुजारी गंभीर जखमी झाले. सहायक फौजदार रवींद्र भाेसले तपास करत आहेत.


