
पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर भागात सोमवारी धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं. राजगुरूनगरमधील एका खासगी ट्यूशनमध्ये एका मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जुना वाद होता. याच वादातून एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार चाकुने गळ्यावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली. चालू क्लासमध्ये ही घटना घडल्याने आता पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारावेळी मृत्यू झालाय. अशातच आता मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे मॅडमने पालकांना सांगायला हवं होतं. शिक्षकांनी पालकांना सांगितलं असतं तर ही घटना टळली असती. माझा मुलगा घरातून बाहेर पडण्याच्या आधीच म्हणाला होता, पप्पा फी भरायचीये. त्यावर मी म्हटलं पुढच्या महिन्यात भरू. आम्हाला 70 ते 80 हजार रुपये फी सांगितली होती. माझी मोठी मुलगी तिथंच होती, म्हणून मी मुलाला देखील तिथंच टाकलं. ऐवढे पैसे भरून सुद्धा मुलं सुरक्षित नाहीत, असं म्हणत मयत मुलाच्या वडिलांनी संताप व्यक्त केला.

तीन दिवसापूर्वी त्याला मारहाण झाली होती. त्याने कुणालाच सांगितलं नव्हतं. त्याने त्याच्या मम्मीला पण सांगितलं नव्हतं. आमच्या घरात लग्न होतं, तिथंही तो आला नव्हता. त्याला पँन्ट फाटेपर्यंत मारलं होतं. एकुलता एक मुलगा होता माझा. सकाळी आम्ही दोघं एकत्र निघालो होतो, असं मयत विद्यार्थ्याचे वडील म्हणाले. भर क्लासमध्ये जर मुलाचा गळा कापत असतील तर शिक्षक झोपले होते का? असा संतप्त सवाल मयत तरुणाच्या पालकांनी विचारला आहे. ही घटना घडली त्यावेळी गणिताचा तास सुरू होता. त्यावेळी हल्ला केलेला तरुण 15 मिनिट लेट आला होता. त्यावेळी शिक्षकाने रोखलं का नाही? असा सवाल देखील विचारला गेला आहे. या प्रकरणावर डीवायएसपींनी प्रतिक्रिया दिली. ‘पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये दहावीतील मुलाची हत्या झाली, मित्रानेच गळा चिरुन तो पसार झालाय.

पण या दोघांमध्ये तीन महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं, त्याचवेळी पोलिसांना याबाबत कळवलं असतं. तर कदाचित ही घटना घडली नसती’,असं डीवायएसपी अमोल मांडवे यांनी माहिती दिलीये. हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केलेत, शिकवणीमध्ये एका बेंचवर बसलेले असताना ही धक्कादायक घटना घडली.आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरुये. पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलांसोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवं. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत? ते फावल्या वेळेत काय करतात? कुठं बसतात? याची माहिती पालकांनी ठेवावी, असं आवाहन ही डीवायएसपी अमोल मांडवे यांनी केलंय.


