
वैष्णवीनंतर भक्तीनेही त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय
प्रेम विवाह करूनही अपेक्षाभंग, उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंबाचा भेसूर चेहरा, महाराष्ट्र हादरला
नाशिक – पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना आता नाशिकमध्ये देखील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे या महिलेचाही प्रेम विवाह झाला होता. उच्चभ्रू कुटुंबातील या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
भक्ती अथर्व गुजराथी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्ती आणि अथर्व यांचा ७ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक ५ वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र, विवाहानंतर भक्तीवर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. भक्तीला त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला माहेरी आणले होते. पण, अथर्वने तिला पुन्हा सासरी नेले होते. पण त्रास सुरूच राहीला. भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायाने सराफी आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. भक्तीने हा टोकाचा पाऊल का उचलला? मृत भक्ती यांना सासरच्यांनी मारहाण केली की पैशांचा तगादा लावला? याचा तपस पोलिसांकडून करण्यात येत आहे. मृत भक्तीचा पती अथर्व गुजराथी हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भक्तीवर तिच्या माहेरी येवला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी संतप्त नातेवाईक व येवलेकर नागरिकांनी निषेध व्यक्त करणारे तसेच भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, अशा आशयाचे फलक झळकावत रोष व्यक्त केला आहे.