
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चव्हाण कुटुंबाबत मोठा ट्विस्ट समोर
गणपतीसाठी गावी गेलेल्या शिक्षकासह संपूर्ण कुटुंब बेपत्ता, मोबाईलही बंद, त्या व्हिडिओमुळे पोलिसही....
चिपळूण – गणपतीनिमित्त गावी निघालेल्या शिक्षकाचं अख्ख कुटुंब बेपत्ता असल्याचा प्रकार समोर आला होता. हिंगोलीमधील शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह कारने प्रवास करत गावी निघाले होते. पण हे कुटुंब अचानक बेपत्ता झाले होते. पण या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे.
ज्ञानेश्वर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचा फोनही लागत नसल्यामुळे सगळे चिंतेत होते. या प्रकरणी पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. पण अखेर ४० तासानंतर हे कुटुंब सापडले आहे. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचा शोध लागला असून सर्वजण सुखरुप आहेत. ज्ञानेश्वर चव्हाण एक व्हिडीओ करत म्हणाले की, गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक कुंभार्ली घाटाजवळ मुसळधार पाऊस असल्यामुळे आमचे मोबाईल भिजले. मोबाईल पाण्याने भिजल्यामुळे दोन्ही मोबाईल बंद झाले होते. दरम्यानच्या काळात काय करायचं काय नाही..असं म्हणत नेहमीप्रमाणे आम्ही गोंदवले महाराज मठ तालुका माण या ठिकाणी मुक्कामी थांबलो. यानंतर आम्ही इकडूनचं घरी जायचं ठरवलं होतं. यादरम्यान मोबाईल बंद असल्यामुळे आमचे सर्व नातेवाईक, मित्र आमची काळजी करत होते. कोणाशीच संपर्क न झाल्यामुळे सगळ्यांना त्रास झाला. त्यामुळे मी माफी मागतो. मी आणि माझे कुटुंब सुखरुप आहोत, अशी माहिती ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. बेपत्ता व्यक्तींचा घरून निघतानाच मोबाईल बंद असल्याबाबत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला सांगितले होते. तरी मोबाईल सी. डी.आर. काढून तसेच तसेच सातारा जिल्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुढील तपास सुरू होता हा तपास सुरू असतानाच गोंदवलेकर महाराजांच्या मठाबाहेर त्यांची गाडी आढळल्याने त्यांचा शोध लागला. दरम्यान दोन दिवस अवघी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली होती. त्यांच्या एका मित्रानेच गुहागर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रारीची नोंद केली. त्यांची शोधाशोध सुरू झाली होती.
हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर चव्हाण हे शिक्षक असून नोकरीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे राहतात. सोबत त्यांची पत्नी स्मिता आणि दोन मुले पियुष आणि शौर्य सुद्धा गुहागरला राहतात. त्यांचे दोन्ही मोबाईल बंद झाले, त्यांच्याशी कोणाचाच संपर्क होईना त्यामुळे चिंता वाढली होती.