Latest Marathi News
Ganesh J GIF

CBSE चा मोठा निर्णय; सहावीपासून ‘या’ ३ भाषा शिकाव्याच लागणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून त्यानुसार इयत्ता सहावीपासून विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत महत्त्वपूर्ण परिवर्तन होणार आहे.

नवीन नियमानुसार, सहावीपासून शिकवल्या जाणाऱ्या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे, तर तिसरी भाषा विद्यार्थ्यांना उपलब्ध 42 भाषांमधून निवडावी लागणार आहे. मात्र, परदेशातून भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.

आतापर्यंत बहुतांश शाळांमध्ये फक्त दोन भाषा अनिवार्य होत्या. आता तिसरी भाषा समाविष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक व्यापक होणार आहे. नवीन भाषा शिकण्यामुळे त्यांच्या विचारशक्तीचा विकास होईल आणि विविध संस्कृतींबद्दलची समज अधिक सखोल होईल, असा CBSE चा विश्वास आहे.

इयत्ता नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांसाठी द्विस्तरीय रचना लागू करण्यात आली आहे. पारंपरिक 80 गुणांच्या परीक्षेसोबतच 25 गुणांची एक अतिरिक्त परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासली जाईल आणि त्याचे गुण मुख्य निकालात न धरता वेगळे दाखवले जातील.

इयत्ता सहावी ते आठवी हा मधला टप्पा मानून या काळात तिसऱ्या भाषेचा अभ्यास सुरू केला जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही भाषा पूर्णपणे नवीन असू शकते, त्यामुळे ती समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार आहे.

CBSE च्या मते, भाषा ही केवळ विषय नसून ती संस्कृती आणि समाजाशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम आहे. विविध भारतीय भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांना देशातील विविधता अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि एकात्मतेची भावना बळकट होईल. एकूणच CBSE चा हा नवा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!