
जळगावमध्ये ईकेवायसीच्या नावाखाली महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी संताप व्यक्त केला.

तसेच महिलांना महत्त्वाचे आवाहन देखील आदिती तटकरे यांनी केले आहे. महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, त्याशिवाय नव्याने लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ईकेवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

