
देव तारी त्याला कोण मारी, त्या पर्यटकाला वाचवण्यात यश*
हुल्लडबाजी करताना पाय घसरला आणि मृत्यूचा दारात अडकला, असा वाचवला पर्यटकाचा जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल
जुन्नर – पावसाळा सुरु असल्यामुळे नदी, नाले, ओढे धबधबे ओसंडून वाहत आहेत. आणि आपल्याकडे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी अशा ठिकाणांना भेटी देत आहेत. पण कधीकधी असे पर्यटन धोकादायक देखील ठरत आहे. असाच काहीसा प्रकार जुन्नर तालुक्यात घडला आहे.
सरकारने बंधने घातल्यावरही अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालत वन पर्यटन करत आहेत. जुन्नर तालुक्यातील काळू धबधब्याच्या प्रवाहात अडकलेल्या एकाची सुटका करण्यात यश आले आहे. एकजण काळू नदीचा प्रवाह पार करत असताना पाय घसरून पाण्यात पडला. तसेच पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात दरीच्या कडेला अडकला. तेथे असलेल्या पर्यटकांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. वाचवणाऱ्या युवकांनी स्कार्फ,ओढणीच्या माध्यमातून दोरी तयार केली होती. जर या पर्यटकाला वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नसते तर त्याचा खोल दरीत पडून मृत्यू झाला असता. अडकलेला व्यक्ती हा पुणे येथून हैद्राबादच्या पर्यटकांना घेऊन आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तरूणाला वाचवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील संतोष जाधव,उमेश रासकर,श्रीकांत आबाळे, संदीप गोरे तसेच स्थानिक तुषार मेमाणे,संदीप साबळे,निलेश पाचपिंड यांनी प्रयत्न केले. स्थानिक तुषार मेमाणे यांनी सांगितले की सदर व्यक्ती ही काळू नदीचा प्रवाह पार करत असताना पाय घसरून पाण्यात पडला. तसेच पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात दरीच्या कडेला अडकला. त्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यांच्या सोबत कोणीही गाईड नव्हता. संतोष जाधव यांनी सांगितले की हा तरुण हुल्लडबाजी करत असताना पाण्याच्या प्रवाहात पडला. त्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आमच्याकडे कोणतीही दोरी उपलब्ध नव्हती त्याचवेळी आमच्या सोबत असलेल्या वेदांत आबाळे यांनी ओढणी व स्कार्फच्या सहायाने दोरी तयार केली व त्याला त्या दोरीच्या माध्यमातून आम्ही वाचवू शकलो. जर आम्ही हा प्रयत्न केला नसता तर तो तरुण खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडला असता.
काळू नदीचे पात्र ओलांडून पर्यटक दुसऱ्या बाजूला जात असताना त्यांचे पाय घसरून ते पाण्यात पडल्याच्या घटना यापूर्वी याठिकाणी घडलेल्या आहेत तसेच याठिकाणी धबधब्यात पडून मृत्यू देखील झालेले आहेत. तरीही नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त पर्यटकांमुळेचे पर्यटनाला गालबोट लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.