
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती पत्नीची आत्महत्या
नवविवाहित जोडप्याचा भयंकर निर्णय, थरारक घटनेनं सगळे हादरले, खासदारांनी घेतली भेट
अयोध्या – लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू अणि वराने एकत्र आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना अयोध्येत घडली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच घरातील आनंदाचे वातावरणात अचानक दु:खात बदलले आहे.
अयोध्येतील कँट पोलीस स्टेशन हद्दीतील सादतगंज येथे राहणाऱ्या प्रदीपचा विवाह मंटू राम यांच्या मुली, शिवानीसोबत, ७ मार्च रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. प्रदीप घरात सर्वात लहान असल्याने त्याचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. प्रदीपचे कुटुंबीय तयारी करत होते. यावेळी सकाळी ७ वाजेपर्यंत प्रदीप खोलीतून बाहेर न आल्याने घरातील लोक त्याला उठवण्यासाठी आले. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता, प्रदीप फासावर लटकलेला दिसून आला, तर शिवानी अंथरुणावर निपचित पडली होती. ही घटना पाहून संपूर्ण घरात एकच आक्रोश पसरला. लग्नाच्या रात्री दोघांनी हे भयंकर पाऊल का उचलले हे कोणालाच समजू शकलेले नाही. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि कायदेशीर कारवाई करत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे. अयोध्येचे खासदार समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे. शोक व्यक्त करत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
प्रदीप आणि शिवानीच्या अचानक मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्नाचा आनंद काही तासांतच दुःखात बदलल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.