
ठरल तर! दोन्ही राष्ट्रवादी ‘या’ दिवशी येणार एकत्र?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजकीय समीकरणे बदलणार, ठाकरेंची फक्त चर्चा, पण पवारांचे मात्र ठरले?
मुंबई – शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवार गट आणि सुप्रिया सुळे गट देखील एकत्र येण्याची चर्चा आहे. पण आता दोन्ही राष्ट्रवादी नक्की कधी एकत्र येणार याबाबतची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावर आमदार अमोल मिटकरी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मिटकरी म्हणाले की, दोन भाऊ एकत्र येणार असतील त्याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणारच आहे. कुणालाच कमजोर समजायचे नाही. पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत दोन्ही एकत्र येतील. पण त्याचवेळी असा कोणताही प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं, येत्या १० जूनला पुण्यात पक्षाचा मेळावा आहे, तोपर्यंत वाट पाहा, असा संकेतही त्यांनी यावेळी दिला. मिटकरी पुढे म्हणाले की, ‘दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. मध्यंतरी विरोध असल्याच्या बातम्या चालवल्या होत्या. पण तसा कुणाचाही कुठलाही विरोध नाही. शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आहेत. अजित पवार आणि पवार साहेब जोही आदेश देणार, तो आमच्यासाठी सर्वोच्च असणार, असेही मिटकरी म्हणाले आहेत. दरम्यान पक्षातील एखाद्या वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की कोणी त्याच्यावर बोलण्याची गरज नाही, असे म्हणत तटकरे यांनी मिटकरांना फटकारले. तसेच अमोल मिटकरी यांनी आता बोलताना जपून वक्तव्य करावे, असे म्हणत त्यांचे कानही टोचले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यावर स्पष्टपणे भूमिका मांडत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
१० जूनला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न होणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेवाडी संकुल येथे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचा बालगंधर्व रंगमंदिर येथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे.