
पावसाळ्यात फिरायला जातात, मग ही बातमी वाचाच!
प्रशासनाने पर्यटकांना प्रतिबंधात्मक आदेश, या ठिकाणी जाण्यास बंदी, नियम मोडल्यास होणार कारवाई
पुणे – पावसाळा सुरू होताच अनेकजण पावसाळ्याचा आणि हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध पर्यटनस्थळी गर्दी करतात. पण अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस किंवा इतर कारणामुळे आपला जीव देखील गमावावा लागतो. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश काढत पर्यटन बंदी घातली आहे.
पावसाळा सुरु होताच अनेक ठिकाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात लोणावळा आणि मावळ तालुक्यातील बहुतांश पर्यटनस्थळी पर्यटकांना सक्तीची मनाई करण्यात आली आहे. ही सक्ती ३१ ऑगस्ट पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या पर्यटनस्थळी कलम १६३ लागू केले आहे. या दरम्यान पर्यटकांनी या पर्यटनस्थळी जाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. हा आदेश ७ जुन पासून ते ३१ ऑगस्ट पर्यंत लागू असणार आहे. या पर्यटनस्थळातून भुशीधरण मात्र वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे हिरमोड झालेल्या पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर भिजण्याचा आनंद घेता येणार आहे. प्रशासनाने पर्यटकांना इतर सुरक्षित ठिकाणी सहलीचा आनंद घेण्याचे आवाहन केले असून बंदी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, अशी सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. हवामान विभागाने शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम या परीसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असून त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यात आले आहेत.