
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, निकषात न बसणाऱ्या महिला सुद्धा योजनेचा लाभ घेत असल्याचं इतकंच नाही तर काही पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं. यानंतर सरकारने सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य केले. महिला व बाल विकास विभागाकडून e-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता. त्यानंतर सरकारने ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी सुद्धा दिली. ई-केवायसी दुरुस्तीची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसीमध्ये दुरुस्ती केली नाहीये अशा महिलांनी तात्काळ दुरुस्ती करावी.फेब्रुवारी महिन्याचा लाभ लाभार्थ्यांना आता मिळणार आहे. कारण, सरकारने या हप्त्याचा निधी वितरीत केला आहे. 31 मार्च 2026 रोजी ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ मिळालेला नाहीये अशा महिलांना एप्रिल महिन्यात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशा तिन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाण्याची शक्यता आहे.



