
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक भागांतील घरांना हलके हादरे बसल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले.

या भूकंपाच्या धक्क्यांचा परिणाम परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत जाणवला. विशेषतः हिंगोली शहर, वसमत आणि कळमनुरी परिसरात भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले. सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काही घरांतील भांडी खाली पडली, तर अनेक नागरिक घाबरून रस्त्यावर आले. लहान मुलांमध्येही भीतीचे वातावरण दिसून आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली, जम्मू काश्मिर आणि चंदीगढ येथेही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणीस्तान होता.मराठवाड्यात जाणवलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कुठे होता, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


