
माणिकराव कोकाटेंना डच्चू भुजबळ होणार नवे कृषीमंत्री?
कोर्टाच्या त्या निर्णयामुळे कोकाटे राजीनामा देणार?, महायुतीची पहिली विकेट?
मुंबई – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं कोकाटेंच्या आमदारकीसह मंत्रीपदावर टांगती तलवार आहे. त्यातच कोकाटे यांचा राजीनामा घेऊन भुजबळांचे पुनर्वसन होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना अवघ्या दोन तासात जामीन देखील मंजूर झाला आहे. पण विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच नवीन कृषीमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले आहे. गेली वीस वर्ष राज्य मंत्रिमंडळात असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना यंदा वगळण्यात आले. नाशिक मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने भुजबळ यांच्या ऐवजी माणिकराव कोकाटे यांना स्थान दिले होते. त्यामुळे कोकाटे आणि भुजबळ समर्थक यांच्यात दरी निर्माण झाली आहे. लवकरच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. त्यावेळी विरोधकांना संधी मिळू नये म्हणून कोकाटेंना डच्चू देत भुजबळ यांना कृषीमंत्री केले जाण्याची शक्यता आहे.
मंत्रिपदापासून दूर ठेवल्यानंतर भूजबळांनी उघड नाराजी व्यक्त करत ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’…डॉयलॉग बोलून दाखवला होता. तसेच गेल्या दोन महिन्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला भुजबळांनी गैरहजेरी लावली होती. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता त्यांची नाराजी दुर करण्यासाठी मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.