
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून घामाच्या धारांनी सध्या राज्यभरात नागरिक त्रस्त आहेत. उन्हाचा तडाखा अनेक ठिकाणी बसत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र असं असलं तरी काही ठिकाणी हवामानीच टोकाची परिस्थिती जाणवत आहे.

याचदरम्यान आता हवामान विभागाने नवा अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असून काही भागांना तर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव, तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ आदी भागातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते. तसेच विजांचा कडकडाट यासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळीचं संकट असल्याने शेतकऱ्यांना पिकांसाठी योग्य ती व्यवस्था करावी लागणार आहे.राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पावसाची नोंद होत आहे. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारपीटही नोंदली गेली. दरम्यान, राज्यातील काही भागांना पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी राज्यातील काही भागांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.



