Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! कॅबिनेट मंत्र्याचे नाव सांगत केले सरपंचाचे अपहरण

सरपंचाने केली स्वतःची सुटका, या दाव्याने मोठी खळबळ, पोलीसांवरही संशय?

बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशमुख प्रकरणाची चर्चा होऊ लागली होती. पण अखेर त्या सरपंचाने स्वतः ची सुटका करुन घेतली आहे.

ज्ञानेश्वर इंगळे हे बीड जिल्ह्यातील कळम आंबाचे रहीवाशी आहेत. ते माजी सरपंचही आहेत. ते दत्ता तांदळे या व्यक्ती बरोबर मसाल्याचा व्यवसाय करतात. आपल्याला व्यवसाय वाढवायचा आहे. त्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडून २० लाख रुपये मिळवायचे आहे. त्यासाठी मुंबईला जायचं आहे. येताना बरोबर दोन लाख रुपये घेवून ये असं इंगळे यांना सांगण्यात आलं. त्यानुसार ते पैसे घेवून केजला पोहोचले. केज पोलिस स्थानकातून एक गाडी बाहेर आली. त्या गाडीत त्यांना टाकण्यात आलं. ही गाडी पाटोद्याच्या दिशेने निघाली. गाडीत त्यांचा पार्टनर देखील होता. यावेळी त्यांना मारहाण करत रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना इंगळे म्हणाले की, गाडीतून निघाल्यानंतर वाटेतच त्यांनी माझा दोरीने गळा आवळला. मी दोन्ही हातांनी प्रतिकार केला. त्यामुळे मला काही झालं नाही. पाटोद्याच्या पुढे एक पेट्रोलपंप बंद पडलेला आहे. त्याच्या पुढे उजव्या बाजूला एक बंगला आहे. त्या बंगल्यात नेवून मारहाण केली. माझे पैसे घेवून मला मारून टाकायचं होतं, या उद्देशाने मला उचललं होतं. संध्याकाळपर्यंत अजून पैसे मागव, तुला सोडून देतो असं देखील ते लोकं म्हणाले होते. मुळात ती गाडीच केज पोलीस ठाण्यातून निघाली होती. मी स्वत: पाहिलंय. त्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार करून उपयोग काय? त्यामुळं मी बीडला एसपी ऑफिसला तक्रार करणार आहे, असेही इंगळे म्हणाले आहेत.

ज्ञानेश्वर इंगळे यांनी थेट एसपी ऑफिस गाठत या संदर्भात आपली कैफियत मांडली, तर दुसरीकडे दत्ता तांदळे याने देखील इंगळे यांच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात आपल्याला मारहाण केल्याचे तक्रार दिली. त्यामुळे आता या घटनेत दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल होऊन गुन्हे दाखल झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!