
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – उपाळे मायणी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून चौघांनी गुप्तीने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना सोमवारी (दि.५) रात्री घडली. सागर रायबा पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच सागर सोबत असलेले त्याचे साथीदार दिग्विजय जयवंतराव बल्लाळ व प्रशांत जयवंतराव बल्लाळ यांनाही दगडाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
सूरज चंद्रकांत माने (वय.२४), मयूर दादासाहेब पडळकर (वय.२४), सौरभ संतोष जमदाडे (वय.२४) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अन्य एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विशाल रायबा पवार यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. उपाळे मायणी येथील संशयित सूरज याच्यासोबत राहत असलेली महिला निघून गेली. ती सागर याच्यामुळेच निघून गेल्याचा राग मनात धरून सूरज, मयूर, सौरभ व अन्य एक अल्पवयीन तरुण यांनी संगनमत करून सागर पवार याला येथील शाळेत बोलावून घेतले. त्या ठिकाणी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर संशयित सूरज माने याने सागर याला गुप्तीने भोसकले. यामध्ये सागरचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दिग्विजय बल्लाळ व प्रशांत बल्लाळ हे दोघे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनाही लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली असून पुढील तपास विट्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील करीत आहेत.