
…तेंव्हा अमृता वहिनींची काय अवस्था होईल
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा उल्लेख करत सरकारच्या धोरणावर टिका, नक्की प्रकरण काय?
अमरावती – प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनास आठवडा उलटून गेल्यानंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. आता बच्चू यांच्या पत्नी नयना कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास आठवडा उलटून गेला आहे. पण अद्यापही सरकारकडून ठोस आश्वासन मिळालेले नाही. यामुळे कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनी सरकारच्या दिरंगाईवर संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, शेतकरी आनंदाने जगावा याचं नियोजन करण्याची अक्कल कोणत्याही सरकारला नाहीये का? बच्चू कडू हे पाचव्यांदा अन्नत्याग आंदोलन करत आहेत, सरकार कोणतंही असो, त्यांनी शेतकऱ्यांसदर्भात गेंड्याची कातडी ओढू नये. बहीण म्हणून मी चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगते कोणत्याही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं. एक दिवस आमच्या देवेंद्र भाऊंनी उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पहावं, असं नयना कडू यांनी म्हटले आहे. तसेच यापुढे जर कोणी बच्चू कडू यांना अन्नत्याग आंदोलन करायला भाग पाडलं तर. लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्य त्याग करायला भाग पाडेल, असा इशारा यावेळी नयना कडू यांनी दिला आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यास १६ जूनपासून पाणीत्याग करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे कडू हे सध्यातरी माघार घेणार नसल्याचे चित्र आहे.
अन्नत्याग आंदोलन शेवट्पर्यंत नेल्याशिवाय हा बच्चू कडू स्वस्त बसणार नाही, कर्जमाफी झाली नाही तर काय करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने बघू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. आज दुपारनंतर ते कार्यकरर्त्यांशी तसेच ज्यांनी ज्यांनी उपोषणाला पाठींबा दिला त्या नेत्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहेत.