
कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना अटक होणार?
नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या, संजय राऊतांवरील ती टिका भोवली, न्यायालयाच्या निर्णयामुळे राणेंना दुहेरी झटका
मुंबई – भाजपाचे आक्रमक नेते मंत्री नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने नुकतेच त्यांचा अर्ज फेटाळत अजामिनपात्र वाॅरंट कायम ठेवले आहे. तसेच नितेश राणे यांना सुनावणीला उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
खासदार संजय राऊत यांनी २०२३ मध्ये दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी मुंबईतील माझगाव न्यायालयाने नितेश राणे यांना मोठा दणका दिला आहे. मानहानी खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिल्याबद्दल गेल्या महिन्यात न्यायालयाने राणे यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर, २ जून रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राणे यांनी सुनावणीला उपस्थित राहण्यापासून कायमची सूट मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायदंडाधिकारी ए. कुलकर्णी यांनी निर्णय देताना तो फेटाळला. तसेच, राणे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढून सुनावणी १८ जुलैपर्यंत तहकूब केली आहे. नितेश राणे आणि संजय राऊत कायमच एकमेकांवर आक्रमक आणि जहाल टिका करत असतात. दोन वर्षापूर्वी नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टिका करताना संजय राऊत हे साप आहेत, तसेच, राऊत हे उद्धव ठाकरे यांना सोडून त्याच वर्षी जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील, असा आरोप केला होता. त्यामुळे राऊत यांनी राणेविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला होता. आता राणे यांना पोलीस अटक करणार की आता मंत्री राणे यांना दिलासा मिळवण्यात यश मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नितेश राणे आपल्या आक्रमक आणि विखारी वक्तव्यामुळे ओळखले जातात. शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपा असा प्रवास केलेले नितेश राणे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. पण त्यापेक्षा ते आपल्या वक्तव्यामुळेच जास्त चर्चेत असतात. त्यामुळे अनेकवेळा भाजपा आणि फडणवीस अडचणीत आले आहेत.