
रविवारी “यशवंतचा” निकाल, यशवंतची धुरा कोणाकडे ? संपूर्ण हवेली तालुक्याचे निकालाकडे लक्ष
लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकांत दुंडे
संपूर्ण पुणे जिल्ह्यासह हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया शनिवारी (ता.९) लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि केसनंद या मतदान केंद्रावर पाडली असुन एकुण मतदान संख्या जवळपास २१ हजार होते. त्यापैकी ११४१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर ब वर्ग सोसायटी गटात २३८ इतके मतदान झाले. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला गेला. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मतदान केंद्रावर सकाळपासून नागरिकांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यामध्ये ८० ते १०५ वर्षापुढील नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे.
यात लोणी काळभोर येथील शकुंतला रामचंद्र काळभोर वय ८६ वर्ष तर फुरसुंगी येथील मारुती धोंडिबा पवार वय १००वर्ष यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उन्हाचा चटका असुन देखील नागरिकांनी मतदान करण्यास पसंती दिली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उरुळी कांचन येथील मतदान केंद्र क्र. १ मध्ये १८३७ व २ मध्ये १८९० हे डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मेडियम स्कूल याठिकाणी मतदान झाले. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मतदान केंद्र क्र. ३,४ व ५ गटांमध्ये ५४५२ मतदान हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.१,२ व ३ येथे संपन्न झाले. तर केसनंद येथील केंद्रावर क्र. ६ व ७ येथे एकुण मतदान २२३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .
लोणी काळभोर येथील मतदान केंद्रावर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार रामदास मेमाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.“यशवंत” ची सत्ता आपल्याच गटाच्या ताब्यात यावी, यासाठी सत्तेच्या रणांगणात उतरलेल्या अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन्ही पॅनेलप्रमुखांनी हायटेक प्रचार यंत्रणेबरोबर साम, दाम व दंड ही आयुधे वापरली आहेत. प्रचार यंत्रणा जोरदार राबवली तसेच ६० वर्षांवरील १३६८३ (६५ टक्के) मतदार आहेत. म्हणजे ६० वर्षांवरील मतदारांचा कल ज्या पॅनेलकडे झुकणार आहे, तो पॅनेल सहजपणे निवडून येणार असून यशवंतचे भवितव्य मतपेटीत बंद त्यामुळे अनेक उमेदवारांची धाकधुक वाढली.