बुलडाणा प्रतिनिधी – कोरोनाच्या दोन वर्षाच्या भयावह काळानंतर राज्यातील शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेल्या आहेत, तर अंगणवाडीत येणार्या बालकांना अक्षर ओळख होण्याबरोबरच परिसराची आणि फळाफुलांची देखील ओळख व्हावी, त्यांना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी यासाठी बुलडाण्यात अनोखी आनंद अंगणवाडी शेतात भरवण्यात येतेय … अंगणवाडी सेविका ह्या अतिशय संवेदनशीलपणे विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत आहेत, यामुळे कोवळ्या मनावर अधिक चांगले संस्कार होतात आणि विविध गोष्टींची नोंद अधिक जलद गतीने होत असते, म्हणूनच अंगणवाडी सेविका मार्फत राबविला जाणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
राज्यात अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यापासून बालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात येतोय… मात्र त्यासोबतच लहान मुलांना अक्षर ओळख होण्याबरोबर परिसर अभ्यास आणि फळाफुलांची माहिती मिळावी यासाठी बुलडाणा प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी केंद्राने शेतातच अंगणवाडी शाळा भरवली, बालकांना फळांची फुलांची नावे समजावीत त्याचे उपयोग समजावेत या अनुषंगाने ही शाळा शेताच्या बांधावर भरवण्यात येतेय .. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका मार्फत हा आनंददायी शिक्षण देण्याचा उपक्रम अंगणवाडी केंद्रांमध्ये राबवला जात आहे… या उपक्रमाचे कौतुक करताना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनीही अंगणवाडी सेविकांना शुभेच्छा दिल्या
चार भिंतीच्या आत शिक्षण देण्यापेक्षा भिंतीच्या पलीकडे जाऊन शिक्षण दिल्यास भविष्यात मुले आकाशात उंच भरारी घेऊ शकतील.. केवळ पाठांतरापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात बालकांना प्रत्यक्ष शिक्षण दिल्यास बालकांचा आत्मविश्वास तर वाढेलच याबरोबरच त्यांच्या मधे नाविन्यपूर्व कल्पना रूजवन्यास देखील मदत होणार आहे… या उपक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी आणि मुख्य सेविका भेटी देत आहेत , तसेच या उपक्रमासाठी आणि बालकांच्या सर्वांगीण वाढीसाठी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शनही करत आहेत