यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : आतापर्यंत बनावट खत आणि बोगस बियाणे बाजारात दाखल होत होते पण आता खरिपातील पेरण्या उरकताच बनावट किटकनाशकही दाखल झाले आहेत. त्यामुळे खतासह कीटकनाशकांची खरेदी करताना शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात बनावट कीटकनाशक आणि खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 7 लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शेतकरी खरिपाच्या लगबगीत असताना बनावट कीटकनाशके विक्री करुन त्याची फसवणूक तर होणारच आहे पण पिकांनाही याचा धोका आहे.
अशी झाली कारवाई
जिल्ह्यात बनावट खत, बियाणांमधून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुकास्तरावर कृषी विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. पांढरवाडा तालुक्यातून याबाबत तक्रार दाखल होताच भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी याचा शोध घेण्यास सुरवात केली. तर जावेद अन्सारी आणि दिनेश कुंडलवार हे गुजरात व तेलंगाना राज्यातून आणलेल्या बोगस किटकनाशक व बनावट खताची विक्री करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अडीच लिटरच्या डब्यामध्ये या किटकनाशकाची आणि रासायनिक खताची साठवणूक केली जात होती. यासंबंधी जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यांच्य्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियंत्रण अधिकारी शिवा जाधव कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
खत खरेदी करताना अशी घ्या काळजी
शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात. त्यामुळे केवळ खरेदी करताना काळजी घेतली तर फसवणूक टळणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात अशा पध्दतीने बोगस खत आणि किटकनाशकांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे.