
मोठी बातमी! अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?
देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीला होणार बदली, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल, शिंदेंचे काय होणार?
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घटना घडत असून, लवकरच मोठा फेरबदल पहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण कायम उपमुख्यमंत्री अशी ओळख असणारे अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर यांनी अजितदादांना मुख्यमंत्रिपद मिळणार, असे भाकीत करत खळबळ उडवून दिली आहे. खतगावकर म्हणाले की, अजितदादा मी जे बोलतो ते खर ठरत असत मी अशोक चव्हाण यांना म्हणालो होतो की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल आणि ते झाले. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये राजकीय चर्चा होते. तिथे अशी चर्चा आहे हे मला माझ्या दिल्लीतल्या मित्रांनी सांगितले आहे की, येत्या दीड वर्षात देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत घेऊन जाणार आहेत. त्यानंतर राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर सोपवले जाणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही नांदेडमध्ये सत्कार घ्यावा अशी विनंतीही खतगावकर यांनी अजित पवार यांना केली आहे. यावेळी अजित पवारांचं कौतुक करत ते म्हणाले की, “राज्यातील धडाडीचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. मी शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम केलं आहे. पण तुमच्याइतकी ऊर्जा, प्रशासनावरील पकड, अभ्यास आणि १८ तास काम करण्याची शारिरीक क्षमता पाहिलेली नाही”. असे खतगावकर म्हणाले आहेत. पण आता खतगावकरांच्या या विधानामुळे राज्याचा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी तर त्यांना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली होती. अजितदादा जोपर्यंत भाजपासोबत आहेत, तोपर्यंत त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीत यावे. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होईल, अशी थेट ऑफरच ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिली होती. तर नाना पटोले यांनीही शिंदे आणि पवार यांनी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची आॅफर दिली होती. दरम्यान खतगावकर यांच्या विधानानंतर शिंदे गट किंवा भाजपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी अजित पवार मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यात महिलेला मुख्यमंत्रिपद मिळायला हवे, अशा आशयाची भावना व्यक्त केली. तसेच मलाही अनेक वर्षांपासून वाटतं की मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय, असं अजित पवार म्हणाले होते. यावर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.