
मुंबई प्रतिनिधी – राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीचं मतदान आज होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण २४६ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्याचे मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मतदान केल्यानंतर केलेल्या विधानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बच्चू कडू यांनी यावेळी राज्याच्या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांचं महत्व वाढत असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. येणारा काळ अपक्ष आमदारांचाच असणार आहे याचा धमाका तुम्हाला आजच्या निवडणुकीत पाहायला मिळेल, असं बच्चू कडू म्हणाले.
महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असाही दावा बच्चू कडू यांनी यावेळी केला. “येणारा काळ अपक्ष आमदारांचाच असणार आहे हे राज्यातील निवडणुकीवरुन तुम्हाला लक्षात आलंच असेल. याचा धमका आजच्या निवडणुकीतही पाहायला मिळेल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं महत्व वाढलं आहे. सर्वांना अपक्षांचं महत्व लक्षात येऊ लागलं आहे. आगामी काळ प्रहार संघटनेचाच असणार आहे आणि पुढचा मुख्यमंत्री प्रहार संघटनेचाच असेल. आमचीच सत्ता राज्यात येईल”, असं मिश्किल विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.