
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत संघर्ष वाढत चालल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.

दुसरीकडे पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी २८ फेब्रुवारीनंतरचा कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरला जाऊ नये असे स्पष्ट पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याने पटेल-तटकरेंची कोंडी झाली होती. मात्र आता याच पत्रामुळे सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि पार्थ पवारांची खासदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सोशल मीडियावर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे ही चर्चा होत आहे. सुनेत्रा पवार यांची सही असलेल्या व्हायरल पत्रात २८ जानेवारीनंतर निवडणूक आयोगासोबत करण्यात आलेला पत्रव्यवहार रद्द करावा असा उल्लेख करण्यात आला आहे.

सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे प्रफुल पटेल यांनी कार्याध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची केलेली निवड रद्द होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र जर असे झाले तर 28 जानेवारीनंतरच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड झाली होती. या संदर्भात प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यासाठी कार्यकारिणीच्या बैठकीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं.
मात्र आता जर हाही निर्णय रद्द झाल्यास राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची झालेली निवड रद्द होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पार्थ पवार यांच्या राज्यसभेच्या एबी फॉर्मवर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या असल्यामुळे सदर अर्ज रद्द होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासोबतच पार्थ पवार यांची खासदारकी देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सोशल मीडियात सुनेत्रा पवार यांच्या व्हायरल होणाऱ्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

