
भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला असून मुलीने जहीर शेख या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जहीर शेखने आपलं अपहरण केल्याची तक्रार मुलीने दाखल केली आहे. या आधी याच मुलीने जहीर शेखसोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं होतं आणि स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचं सांगितलं होतं.त्यानंतर या मुलीने तिचा जबाब बदलला. आता जहीर शेख या तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटलंय की, 17 फेब्रुवारीला आई सोबत आणि भावासोबत लग्नाची खरेदी करण्यासाठी गेली असताना आपलं अपहरण करण्यात आलं. यामध्ये तिने जहीर शेखचं नाव घेतलं आहे.

याआधी तरुणीने शपथपत्रात काय म्हटलं होतं?

संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वतःच्या पळून गेलो, असं म्हटलं होतं. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे, तो खोटा असल्याचंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं.
दरम्यान, मुलगा आणि मुलगी भिगवममधून बाहेर पडल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले होते.

