
गेल्या काही वर्षात खाण्या पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ चर्चाचा मुद्दा राहिला आहे. मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. त्यात अनेक सत्य समोर आले. त्यानंतर 10 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका शेतकरी दाम्पत्यानी रात्री जेवणात चिकन खाल्लं अन् त्यानंतर दही खाल्ल्याने एका महिलेला विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवलं होतं. अशातच आता याच प्रकरणात महिलेच्या नवऱ्याचाही मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचं जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलंच जीवावर बेतलं. रविवार 28 जून रोजी रात्री चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्यांचे पती शांताराम यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पण दोन्ही नवरा बायकोच्या मृत्यूने संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

पत्नीच्या मृत्यूनंतर पती शांताराम यांची प्रकृती देखील खालावली होती पण त्यानंतर त्यांच्यावर देखील उपचार सुरू होते पण अखेर त्यांची देखील प्राणज्योत मावळली आहे. या घटनेनंतर सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथे अन्न व औषध प्रशासनाची (FDA) टीम दाखल झाली होती. त्यानंतर त्यांनी देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. अशातच आता नेमकी विषबाधा कशामुळे झाली? असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, तज्ज्ञांनी यावर अनेक तर्क वितर्क लावले आहेत. ‘नातेवाईकांकडून चिकनच्या जेवणानंतर दही खाल्ल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. चिकन आणि दही हा विरुद्ध आहार असला तरी त्यामुळे इतकी गंभीर विषबाधा होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे वैद्यकीय दृष्ट्या पटत नाही. त्यामुळे नेमके कारण काय आहे, याचा तपास होणे आवश्यक असल्याचं रुग्णालयाचे डॉ. निखिल निकम यांनी म्हटलं होतं.

