Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवारांसह इतर काहींची राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली चौकशी करावी- संजय राऊत

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी केलेल्या बंडखोरीवर भाष्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्तपणे भेट कशी घेतली.अमित शहा यांना भेटण्यासाठी ते दिल्लीला वेशांतर करून कसे गोले आणि विमानाची तिकीट कोणत्या नावाने बुक केले, यासंदर्भात सर्व माहिती दिली होती. याचपार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नाट्यकलेविषयी माध्यमांना माहिती दिली की, ते मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान 10 ते 12 वेळा वेष पालटून गेले. नुसते वेष पालटून गेले नाही, तर बनावट नावाने गेले. त्यांनी वेष बदलला हा प्रश्न नाही आहे, तर विमान तळाची सुरक्षा किती ढिसाळ आहे की, कोणताही माणूस बनावट नावाने वेष पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्लीसारख्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो. याचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी या काळामध्ये जो खेळ झाला आहे. त्यात या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सामील आहेत. अजित पवार यांचे उदाहरण घेऊन अतिरेकी नाव बदलून, वेष बदलून देशात घुसू शकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पडण्याआधी मुंबई आणि दिल्लीत वेष पालटून फिरत होते. माझ्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा वेगळ्या विमानतळावरून दिल्लीला गेले, तेव्हा ते मौलवीच्या वेषात गेले. त्यांना दाढी आहेच, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेषात दिल्लीला गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर वगैरे चित्रपटाची निर्मिती किंवा ते स्वत: आनंद दिघे यांचे शिष्य म्हणत असले तरी ते अनेकदा मौलवीच्या वेषात गेले आणि अमित शहांना नाव बदलून भेटले.

अजित पवार वेषांतर करून आणि नाव बदलून दिल्लीत येतात. त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही. एकनाथ शिंदे नाव बदलून आणि वेषांतर करून दिल्लीत जातात. त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही. याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवली आहेत. त्यांचं पॅनकार्ड, पासपोर्ट आणि आधारकार्ड असेल हेही त्यांनी बनावट बनवलं असेल. कारण ओळखपत्राशिवाय विमानतळावर सोडणार नाही. या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी प्रवासात वापरलेले बोर्डींग पास किंवा ओळखपत्र जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांची राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवाद्यांना प्रेरणा दिलेली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.या सर्व संदर्भात संसदेत तुम्ही प्रश्न मांडणार आहात का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातले काही प्रमुख यावर चर्चा करणार आहोत. हा आमच्यासाठी खूप गंभीर प्रश्न आहे. प्रश्न अजित पवार किंवा अमित शहांचा नाही आहे. या देशामध्ये चीन आणि काश्मिरमध्ये अतिरेकी का घुसत आहेत? हे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!