
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र पक्षाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. सुनेत्रा पवार यांना राज्यसभा उमेदवारी दिल्यानंतर भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
छगन भुजबळ म्हणाले की, मीसुद्धा राज्यसभा लढण्यासाठी इच्छुक होतो. पण सुनेत्रा पवारांना उमेदवारा देण्याचा निर्णय झाला. पक्षात चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला. माझ्या तोंडावर दिसतंय का नाराज आहे? मी नाराज नाहीय, पक्षात सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात.प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. माझ्यासोबत आनंद परांजपे इच्छुक होते. १३ लोक इच्छुक होते म्हणताय मग सगळ्यांना उमेदवारी देणं शक्य आहे का? एकालाच उभा करायचंय, तर सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झालं असंही भुजबळांनी सांगितलं.
पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. मी अपक्ष नाही. पक्षाचा कार्यकर्ता, मंत्री, नेता म्हणून पक्षाचा जो निर्णय असेल त्यानुसार काम करावं लागतं. काही बंधनं असतात पक्षाची असं भुजबळ म्हणाले. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून डावललं जात असल्याच्या चर्चा होत आहेत. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, मी कालच्या बैठकीला उपस्थित होतो. मग मला कुठे डावललं जातंय?अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. या उपोषणावर भुजबळ म्हणाले की, माझं म्हणणं असंय की जरांगेंनी उपोषण करून नये, ते थांबवायला हवं. ओबीसींना धक्का लागणार नाही असं आरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करतंय. सगळे निवडणुकीतून आता मोकळे झाले आहेत. तर सरकारला वेळ द्यायला हवा ना.