
मोठी बातमी! भारत आणि पाकिस्तानमध्ये तात्काळ युद्धविराम
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा, अमेरिकेची यशस्वी मध्यस्थी, युद्धबंदी करताना भारताची 'ही' अट
दिल्ली – मागील चार पाच दिवसापासून सुरु असलेला भारत पाकिस्तानमधील तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. त्यामुळे सीमेवरील संघर्ष थांबण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर सतत ड्रोन हल्ले, गोळीबार आणि तणावपूर्ण परिस्थिती असताना, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर चिंता वाढवणाऱ्या परिस्थितीत हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपासून दोन्ही बाजूंनी कारवाया थांबल्याचे मिस्त्री यांनी सांगितले. दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील असेही मिस्त्री यांनी यावेळी सांगितले. यावेळी आगामी काळातील संबंधावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. यात त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. मिस्त्री यांच्या घोषणेपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती केला आहे. याबाबत ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. हे जाहीर करताना त्यांना आनंद होत असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, अद्याप याबाबत भारताकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नव्हता, पण भारताने अधिकृतपणे युद्धविरामाची घोषणा केली आहे. दोन्ही देशात ७, ८ आणि ९ मे रोजी मध्यरात्री दोन्ही देशांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले सुरू होते. ज्यामध्ये भारतातील काही जवान शहिदही झाले. तर पाकिस्तानात शंभरहून अधिक लोक मारले गेले आहेत. दरम्यान दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानं मोठी घोषणा केली आहे, दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. या तणावाच्या वातावरणात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते नष्ट केले होते.