
मोठी बातमी! ठाकरे गट महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार
महाविकास आघाडी फुटली, जे काही होईल ते होईल म्हणत ठाकरे स्वबळावर, काँग्रेस, राष्ट्रवादीत अस्वस्थता?
मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. काय होईल ते होईल, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणूकीत महायुतीला पूर्णपणे एकतर्फी यश मिळाल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यामुळे मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट हा पक्ष मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी घोषित केले आहे.खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईपासून नागपूर महापालिका आम्ही स्वबळावरुन लढणार, मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे, अशी मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. याबाबत आम्हाला उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच लोकसभा निवडणूक होऊन एवढे महिने झाले तरी इंडिया आघाडीची अजून एकही बैठक झाली नाही. काँग्रेस हा विरोधी पक्षांतील सर्वात मोठा पक्ष आहे, बैठक बोलावण्याची काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे. मात्र, अजून एकही बैठक होऊ शकलेली नाही, अशी खंतही संजय राऊत यांनी व्यक्त केली.दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या विधानावर आता कॉंग्रेस नेत्यांनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहते. प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या असतात. आघाडीत यावर चर्चा होईल, असे काँग्रेसने सांगितले आहे.
भाजपविरोधात लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीची घोषणा केली होती. या आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते, मात्र विधानसभा निवडणूकीत आघाडीचा दारूण पराभव झाला होता. आता महापालिका निवडणूका ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी तुटली असल्याचे समोर आले आहे.