देशात 19 एप्रिलपासून सुरू झालेली लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.सातव्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे.शेवटच्या टप्प्यात 8 राज्यांतील 57 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, पंजाबमधील 13, ओडिशातील 6, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3 आणि चंदीगडमधील 1 जागांचा समावेश आहे.
सातव्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सातव्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची जाहीर सभा पंजाबमधील होशियारपूरमध्ये होणार आहे. येथे पंतप्रधान सकाळी 11 वाजता विशाल फतेह रॅलीला संबोधित करतील.तर राहुल गांधी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात प्रचार करणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी दुपारी 1 वाजता सोलनमधील मॉल रोडवर शिमला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार विनोद सुलतानपुरी यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव महाराजगंज येथील सभेला संबोधित करणार आहेत. इंडिया अलायन्सचे उमेदवार वीरेंद्र चौधरी यांच्या समर्थनार्थ ते येथे प्रचार करणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज पंजाबच्या दौऱ्यावर आहेत.
वाराणसीची सर्वाधिक चर्चा होत आहे असून येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. वाराणसीमध्ये काँग्रेसचे अजय राय आणि बसपाचे अथर जमाल लारी पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.हिमाचलच्या मंडी या जागेवरून भाजपच्या कंगना राणौत रिंगणात असून, काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांच्या विरोधात त्यांची लढत आहे. याशिवाय गोरखपूरमधून भाजपचे रवी किशन आणि समाजवादीच्या काजल निषाद, हमीरपूरमधून भाजपचे अनुराग ठाकूर आणि काँग्रेसचे सत्यपाल सिंह रायजादा आणि डायमंड हार्बरमधून टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी आणि भाजपचे अभिजित दास यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 4 जून रोजी मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे.