
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ‘लाडकी बहीण योजना’ आणली आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोंढणपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंहगडाच्या निष्ठावंत शिलेदारांचा आभार मेळावा’ या कार्यक्रमात सुळे बोलत होत्या.खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोंढणपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंहगडाच्या निष्ठावंत शिलेदारांचा आभार मेळावा’ या कार्यक्रमात सुळे बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या, ‘महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. सध्याच्या सरकारवर नागरिक नाराज असून, त्याला सक्षम पर्याय आपण देणार आहोत. हे सरकार आपल्याला बदलायचे आहे आणि ते शंभर टक्के बदलणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी आतापासूनच एकजुटीने कामाला लागायचे आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार, विद्यार्थी, कामगार, अशा सर्वांचे प्रश्न सोडविण्यात सध्याचे सरकार अपयशी ठरत आहे. यावेळी काकासाहेब चव्हाण, लहू निवंगुणे, रवींद्र मुजुमले, गणपत खाटपे, नितीन वाघ, पूजा पारगे, नवनाथ पारगे आदी उपस्थित होते.
खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळावा, अशी भावना उद्धवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारीही याबाबत बोलले. यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवार ठरविताना सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेतले जाणार असून, एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही. या मतदारसंघात महाविकास आघाडीचाच आमदार होणार असून, ज्या घटक पक्षाचा उमेदवार असेल, त्यासाठी सर्वांनी लोकसभेला एकजुटीने काम केले, तसेच काम विधानसभेला करायचे आहे.