
उपमुख्यमंत्री अजितदादा जिंकले, पण बुजुर्ग तावरेही नडले
माळेगावात सर्व जागा जिंकण्याचे अजितदादांचे स्वप्न भंगले, तावरेंचा विजय दादाच्या जिव्हारी? कोण आहेत तावरे?
बारामती – गेल्या काही दिवसांपासून राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलचे २१ पैकी २० जागा निवडून आल्या आहेत. पण एका जागेवर मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचीच जास्त चर्चा होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावची निवडणूक सत्ता हातात असल्यामुळे सहजपणे २१-० अशा फरकाने ही निवडणुक जिंकतील, असा अंदाज होता. तशीच वाटचाल देखील होत होती. मात्र, या निवडणुकीतील सर्वात बुजुर्ग उमेदवार चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांना आव्हान देत सांगवी गटातून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे सत्ता येऊनही अजित पवार पूर्ण आनंद साजरा करु शकले नाहीत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारावेळी अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांना वयावरुन लक्ष्य केले होते. ‘आता तुमचं वय झालं, ८५ वर्षे झाले तरी थांबायला तयार नाही’, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यामुळे चंद्रराव तावरे यांनी आपला सर्व अनुभव पणाला लावला होता. आणि मतदारांनीही त्यांना साथ देत विजयाचा कोैल दिला. अजित पवारांनी वयाचा मुद्दा काढल्यानंतर ‘राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार मुख्यमंत्री व्हायचे सोडून कारखान्याचे चेअरमन व्हायला निघाले आहेत. त्यांनी तालुक्याची प्रतिष्ठा कमी केली. उपमुख्यमंत्री मीच, मंत्री मीच, आमदार मीच, कारखान्याचा चेअरमन मीच… सगळीकडे मीच’, असा टोला चंद्रकांत तावरे यांनी लगावला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादांच्या टीममध्ये एकेकाळी काम केलेले चंद्रराव तावरे यांनी २०१५ साली अजितदादांचा याच माळेगाव कारखाना निवडणुकीत पराभव केला होता. त्यामुळे अजित दादा तावरे यांचे राजकीय उट्टे काढणार यात शंकाच नव्हती कारखान्याचे माजी अधयक्ष रंजन तावरे यांचा पराभव त्याचाच एक भाग होती. पण चंद्रराव तावरे यांनी मात्र अजितदादांच्या मनसुब्यावर पाणी फेरत दणक्यात विजय मिळवला. त्यामुळे अजित पवार यांच्या विजयापेक्षा चंद्रराव तावरे यांच्याच विजयाची चर्चा होत आहे. दरम्यान आता अजित पवार चेअरमन होणार की तावरे विरोध करत तो प्रयत्न हाणून पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चार पॅनल झाले होते. अजित पवार यांचा निळकंठेश्वर पॅनल,चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांचा सहकार बचाव पॅनल, शरद पवार गटाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल, कष्टकरी शेतकरी पॅनल व अपक्ष मिळून असे ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.