
पेट्रोल पंप चालकाने केली चक्क मुख्यमंत्र्यांची फसवणूक?
डिझेल ऎवजी गाडीत भरले पाणी, गाड्या वाटेतच बंद पडल्या, पेट्रोल पंप सील, कारण काय?
रतलाम – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हा गाड्यांमध्ये एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यात आले. तिथून काही अंतर गेल्यानंतर एकामागून एक या सर्व गाड्या बंद पडल्या. तपासाअंती पेट्रोप पंप चालकाने चक्क मुख्यमंत्र्यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री यादव रतलाममध्ये प्रादेशिक उद्योग, कौशल्य आणि रोजगार परिषदेत सहभागी होणार होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ गाड्या डिझेल भरण्यासाठी रतलाम शहरी हद्दीतील दोसीगाव येथील भारत पेट्रोलियमच्या शक्ती इंधन पेट्रोल पंपावर पोहोचल्या होत्या. डिझेल भरल्यानंतर काही वेळातच सर्व गाड्या काही अंतरावर गेल्यानंतर थांबल्या. या अनपेक्षित घटनेने सर्वजण चक्रावले. या गाड्यांमध्ये भरलेल्या डिझेलमध्ये पाणी मिसळल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. माहिती मिळताच नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न आणि पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तपासात असे दिसून आले की ज्या वाहनांमध्ये २० लिटर डिझेल भरले होते, त्यातून सुमारे १० लिटर पाणी बाहेर पडले. जवळजवळ सर्वच वाहनांमध्ये ही परिस्थिती आढळून आली. एका ट्रक ड्रायव्हरने २०० लिटर डिझेलही भरले होते, जे थोड्या अंतरावर थांबल्यानंतर थांबले. अन्न आणि पुरवठा विभागाने रात्रीच पेट्रोल पंप सील केला. तसेच शुक्रवारी होणाऱ्या एमपी राईज कॉन्क्लेव्हमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून इंदूरहून नवीन वाहनांची व्यवस्था करून मुख्यमंत्र्यांना रतलामला पाठवण्यात आले. डिझेलमध्ये पाणी कसे मिसळले गेले, याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उपाध्याय यांनी सांगितले आहे. पण या प्रकरणाची जोरदार चर्चा राज्यात होत आहे.
पावसाचे दिवस आणि त्यात इथेनॉल मिश्रीत इंधन यामुळे अनेकांच्या गाड्यांच्या इंधनाच्या टाकीत पाणी तयार होत आहे. या पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी टाक्यांमध्ये या थेंबापासून इथेनॉलबरोबर प्रक्रिया होऊन ते पाणी तयार करत आहे.