
माजी मंत्र्याची लेक म्हणते एक खून माफ करा
थेट राष्ट्रपतींना लिहिले पत्र, कारणही लिहिले, पत्राची होतेय जोरदार चर्चा, एकदा वाचाच!
जळगाव – राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. आज जागतिक महिला दिन असल्यामुळे त्यांच्या वक्तव्याला वेगळा अर्थ आला आहे.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एक खून माफ करण्याची मागणी केली आहे.

खडसे यांचे पत्र जसेच्या तसे
मा. द्रौपदी मूर्मू राष्ट्रपती
विषय :- एक खून माफ करणेबाबत
महोदया,
सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे…
आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल ?
नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.
आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू
धन्यवाद!
रोहिणी खड़से
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्षा