
मी दोन दिवसांपासून येथे आहे. मी ठाण मांडून बसलो म्हणजे करेक्ट कार्यक्रम करूनच जातो, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधकांना दिला.ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामकरणाविरोधात आलेल्या याचिका कोर्टाने फेटाळल्यामुळे महाविकास आघाडीसह नामकरणाच्या विरोधात असणाऱ्यांना मोठी चपराक बसल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.
कोर्टाच्या निर्णयाचा निवडणूक निकालावर परिणाम होईल काय, यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की निवडणुकांशी संबंध जोडणारे हे महाविकास आघाडीचे आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ करणाऱ्या औरंगजेबाचे नाव या जिल्ह्याला राहावे, यासाठी ज्यांनी भूूमिका घेतली, त्यांना संभाजीनगरकर धूळ चारतील.तुम्ही काँग्रेससोबत जाणार, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले, यावर शिंदे म्हणाले, त्यांनी जावईशोध लावला आहे. मी सर्वकाही जाहीरपणे करतो. लपून-छपून काहीही करीत नाही.
‘राजा का बेटा राजा नही होता, जो काम करेगा वो राजा बनेगा’ आमच्याकडे कोणी मालक नाही. उद्धवसेनेत सवंगड्यांना घरगडी बनविले जाते, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.या शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व्हावे, याचा पहिला निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला. त्यानंतर निव्वळ श्रेयवादासाठी भाजप आणि महायुतीकडून ठरवून त्यांचीच माणसे आक्षेप व्यक्त करणाऱ्या याचिका घेऊन न्यायालयात गेले. या सगळ्या याचिका न्यायालयाने खारीज केल्या आणि नामकरणाचा मार्ग मोकळा झाला, असे उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.