
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.आमदार राऊत हे जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आज अंतरवाली सराटीत आले होते. मनोज जरांगे पाटील यांचे मागील आमरण उपोषण सोडवण्यासाठी राऊत यांनी मध्यस्थी केली होती.आमदार राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जाते. आज राऊत यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. दरम्यान काल मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज लगेच आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्यात एका तासापासून अधिक वेळ चर्चा झाली. 20 जुलै रोजी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये महत्वाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दोन महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र, जरांगे यांनी एका महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत निर्णय घेण्यासाठीची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली असून मनोज जरांगेंनी 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.सरकारने आरक्षणाची मागणी पूर्ण केली नसून यावेळी कडक आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी यापूर्वी दिला होता. 20 तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्याची हाक त्यांनी दिली होती. दरम्यान, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात आल्यानंत आता शांतता रॅलीचा पुढचा टप्पा ठरवण्यासाठी पूर्वनियोजन बैठक बोलवण्यात आली आहे. पुढच्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात कुठे कुठे शांतता रॅली होणार? कसे नियोजन असणार यावर पश्चिम महाराष्ट्रातील समन्वयकांसोबत आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे चर्चा करणार आहेत.