
शिरूर- हवेली विधानसभा मतदार संघातुन महायुतीचे अधिकृत उमेदवार माऊली आबा कटके विजयी भव होणारच – प्रदीप कंद
प्रतिनिधी -चंद्रकांत दुडे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्य जनतेसाठी जलजीवन योजना ,शेतकऱ्यांसाठी पीकविमा, सन्मान योजना देऊन वीजबिल माफी केली आहे. सरकारने महिलांसाठी अर्ध्या दराने बस प्रवास व मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून बहिणींना पैसे दिले आहेत. त्याचबरोबर मोफत रेशन धान्य व तीन गॅस मोफत दिले आहेत. महायुती सरकारने राज्यात अनेक कामे करून विकासकामांची गंगा वाहिली आहे. त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके विजयी भव होणारच. असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी केले आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी हवेलीत प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. ज्ञानेश्वर कटके यांचे कुंजीरवाडी (ता. हवेली) चौकात फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील हनुमान मंदिराजवळ एक छोटेखानी सभा झाली. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन प्रदीप कंद यांनी केले आहे.
यावेळी बोलताना प्रदीप कंद म्हणाले की, शिरूर हवेली तालुक्यातून तुम्हा दोघांपैकी एक उभा राहा. अशी जनता वारंवार सांगत होती. त्यातच पक्षाचे आदेश आल्याने निवडणुकीतून माघार घेतली आहे. आणि संयम आणि समजूतदारपणे मोठ्या भावाची भूमिका बजावून माऊलींना पाठींबा दिला आहे. तुम्ही विकासकामांची चिंता करायची सोडून द्या. याची सर्व जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. तुम्ही फक्त सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्ञानेश्वर कटके याच्या समोरील घड्याळ्याचे बटन खटाखट दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. असे आवाहन प्रदीप कंद यांनी यावेळी केली आहे.