
राजकीय भूकंप! शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार
महाराष्ट्रात लवकरच होणार राजकीय भुकंप?, शरद पवारांचा गाैप्यस्फोट, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री?
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारण लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा होत असताना दुसरीकडे आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. खुद्द शरद पवार यांनीच याबाबत विधान केले आहे.
शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. मुलाखतीत तुमच्या स्वतःच्या पक्षाचे भविष्य तुम्हाला कसे दिसते? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार म्हणाले की आमच्या बाबतीत, पक्षात दोन मते आहेत. एक म्हणजे आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र यावं. दुसऱ्या गटाला वाटतं, की आम्ही थेट किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसोबत जाऊ नये. त्यामुळे इंडिया आघाडीत सामील होऊन आघाडीची पुनर्रचना करावी. तसेच संसदेत विरोधी पक्षात बसायचे की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावे असे सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केले आहे. पवारांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावे. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे, त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत. माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेही मागच्या काही दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार हे कालही माझे दैवत होते, आजही आहेत अशा प्रकारचं भाष्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार या चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना, आता शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात लवकरच भूकंप होणार अशी चर्चा होत आहे.
सर्वोच न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित केल्या जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही गट निवडणूकी आधी एकत्र येणार की नंतर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, दरम्यान ते एकत्र आल्यास ठाकरे आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.