
सत्तासंघर्ष! महायुतीतून ‘या’ बड्या नेत्याचा पक्ष बाहेर पडणार
राजकीय समीकरणे बदलणार? राज्यात नव्या राजकीय समीकरणाची सुरूवात? महायुतीत वादाची ठिणगी?
मुंबई – राज्यात महायुतीचे दोनशेहुन अधिक आमदार निवडून आल्यानंतर राज्यात स्थिर सरकार राहील अशी अपेक्षा होती. पण आता राज्यात पुन्हा एकदा सत्तासंघर्ष होत असून लवकरवच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीतील एक पक्ष लवकरच महायुतीची साथ सोडणार आहे.
माजी मंत्री महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण जानकर यांनी नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली होती. माझाही पक्ष आहे. पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहीजे, अशी मनातील खदखदही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान जानकर यांनी प्रत्यक्षपणे काँग्रेस सोबत जाणार असल्याचे म्हटले नसलं तरी आगामी काळात व्यवस्थित वाटाघाटी झाल्यास आम्ही युपीए सोबत जाऊ असेही जानकर म्हणाले आहेत. जानकर म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यामुळे आता भाजपाला आमची गरज उरलेली नाही. पण माझाही पक्ष आहे. पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहिजे, असे जानकर यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, त्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करायचे आश्वासन दिले होते, ते पाळले गेले पाहिजे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समाविष्ट करावा आणि मराठा आरक्षण द्यावे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना बंद करू नये, असे जानकर म्हणाले. माझ्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे मोठे आहेत. मोठा पक्ष छोट्याला दाबतो, त्याचा अनुभव त्यांना येईल. आमच्यासाठी भाजपाने दार बंद केली आहे. आमची काही चूक नाही, अशी खंत जानकर यांनी बोलून दाखवली. राज्यात महायुतीत धुसपूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट चांगलेच नाराज झाले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात पुन्हा एकदा खटके उडताना पाहायला मिळत आहेत. त्यात आता जानकरही आक्रमक झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री महादेव जानकर महायुतीत आले होते. त्यानंतर महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा निवडणुकीत उतरवले होते. परंतु मविआचे उमदेवार संजय जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. महायुती सत्तेत आल्यानंतर त्यांना सत्तेत काही स्थान मिळालेले नाही.