
अंगावरच्या ओल्या हळदीसह सैनिक नवरदेव देशासाठी सीमेवर
पतीला निरोप देताना नव्या नवरीला अश्रू अनावर, ऑपरेशन सिंदूरसाठी कुंकू देशाच्या रक्षणासाठी रवाना
जळगाव – भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता वाढली आहे. कारण आॅपरेशन सिंदूरनंतर सीमेवर कमालीचा तणाव आहे. त्यामुळे सुट्टीवर असलेल्या जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना पुन्हा लवकरात लवकर कामावर परतण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पण जळगावमध्ये मात्र एक भावनिक घटना समोर आली आहे.
ऑपरेशन सिंदूर कारवाईच्या पार्श्वभूमीवर लष्करातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहे. त्यांना तातडीने सेवेत रुजू होण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकसह परिसरातील असंख्य जवान सुट्टी अर्धवट सोडून लष्करी सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी रवाना झाले आहेत. यानंतर जळगावमधील एक भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कारण जळगावमधील जवान मनोज पाटील यांचा यामिनी यांच्याबरोबर ५ मे रोजी विवाह संपन्न झाला होता. लग्न होऊन एक दोन दिवस झाले असताना अचानक त्यांना सुट्या रद्द करत तातडीने सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले त्यावर मनोज पाटील यांनीही देश सेवेला प्राधान्य देत रेल्वेने सेवा देण्यासाठी रवाना झाले. यावेळी मनोज यांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी विवाहिता यामिनी यांसह कुटुंबातील सर्व सदस्य हजर होते. त्याक्षणी यामिनीच्या डोळ्यातील अश्रू खुप काही सांगून जात होते. कारण आज नववधुसोबत मनोज पाटील सत्यनारायणाच्या पुजेला बसणार होते. पण पूजा रद्द करुन जवान मनोज पाटील रवाना झाले आहेत. कुटुंबाबरोबर लग्नाचा आनंद साजरा करत असताना, मुलाने देशसेवेला प्राधान्य दिले. त्यामुळे मला त्याचा अभिमान असल्याचे जवान मनोज यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले. देशापेक्षा मोठे काहीही नसल्याची भावना जवान मनोज यांची नववधू यामिनी हिने व्यक्त केली आहे.
पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनीत मनोज पाटील यांचा घर आहे. तिथूनच ते रवाना झाले. त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मनोज पाटील यांचा सत्कार करत भारत नक्की विजयी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.