Latest Marathi News
Ganesh J GIF

सर्वात मोठी बातमी, पहाटेच्या शपथविधीचा पूर्ण पट अजित पवारांनी उलगडला

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर दुसऱ्यांदा हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमात अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्यावेळी नेमकं काय-काय ठरलं होतं याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाली होती. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन करण्याचं निश्चित केलं होतं. पण त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं होतं. पण ते सरकार फक्त 78 तास टिकलं होतं. पहाटेच्या त्या शपथविधीच्या घडामोडींबाबत अजित पवार यांनी आज इंदापुरात मोठा खुलासा केला.

“2004, 2009, 2014 आणि 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करते होते”, असं म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांना टोला लगावला. “देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली. ते म्हणाले, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घेण्याचं ठरलं. मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टीकू शकलं नाही”, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

“हर्षवर्धन पाटलांशी आमची बैठक झाली होती. महायुतीत आपल्याला एकत्र काम करायचं असं ठरलं. अमित शाहांसोबत लढायचं ठरलं. साखर कारखाने अडचणीत आले. ते अमित शाहांनी सोडवलं. अंकीता पाटलांनी सांगितलं त्यांना मी सांगतो अजित पवार हा शब्द पाळणार आहे. देवेंद्रजींची ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आचारसंहितेचे काही नियम असतात. ते पाळावे लागतात”, असं अजित पवार म्हणाले.“अमित शहा यांचा सहकार क्षेत्रातील विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी संपादीत केला आहे. मी महायुतीचा धर्म पाळणार, हा अजित पवारचा शब्द आहे. मी काल बोललो कचाकचा बटन दाबा. मग लोकं म्हणाले की, आचारसंहितेचा भंग झाला. पण अनेक जण काही बोलतात ते भंग होत नाही का? “, असा सवाल अजित पवार यांनी केला.

“उद्या बारामतीमध्ये मी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. हर्षवर्धन पाटील त्यांच्या पद्धतीने सभा घेतील आणि दत्ता मामा यांती वेगळी सभा होईल आणि त्यानंतर संयुक्तिक सभा होतील. देश मजबूत असेल तर राज्य मजबूत राहतील. काही जणं जर चुकत असतील तर त्यांना सांगावं लागेल. समज गैरसमज होऊ देऊ नका. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एक काम झालं की दुसरं काम ते झालं की तिसरं. आपल्या पक्षात मात्र अलबेल नव्हतं. इथे तसं चालत नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आरएसएसची त्यांना शिकवण आहे. मोदी साहेबांच्या डोक्यात नेहमी देशाचा विकास असतो. मोदी निवडून आले की संविधान बदलतील अशा थापा मारल्या जातात”, असं अजित पवार म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!