
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पतीने केली पत्नीची हत्या
हत्या करुन पती फरार, या कारणामुळे फुटले हत्येचे बिंग, पाच वर्षाची चिमुकली अनाथ
अमरावती – पती पत्नीमध्ये नेहमीच वाद होतात. पण काहीवेळा हे वाद जीवघेणे ठरतात. अशाच एका वादातून अमरावतीत पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. पण पती सध्या फरार आहे.
भांडण झाल्यानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीला घरी बोलावून तिची पतीने हत्या केल्याची घटना शहरातील यशोदा नगर परिसरात उघडकीस आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी फरार झाला, मात्र पोलिसांनी घटनेचा तपास करून हत्येचा उलगडा केला आहे.
भाग्यश्री अक्षय लाडे असे मृत महिलेचे तर अक्षय दिलीप लाडे असे फरार झालेल्या पतीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
७ वर्षांपूर्वी भाग्यश्री हिचे अक्षय लाडे सोबत लग्न झाले. त्यांना ५ वर्षांची मुलगी आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून पती- पत्नीचा काही कारणावरून वाद झाला आणि पत्नी भाग्यश्री ही माहेरी गेली. त्यानंतर १ जानेवारी रोजी रात्री भाग्यश्री ही तीच्या दुचाकीवरून सासरी कपडे घ्यायला गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्री हरवल्याची तक्रार दिली होती. पोलीसांनी तपास सुरु केला असता भाग्यश्रीचे लोकेशन स्टेशन परिसरात आढळून आले. पोलिसांनी रेल्वेस्थानक येथे जाऊन पाहिलं असता, तिथं भाग्यश्रीची गाडी दिसली तेथील सीसीटीव्ही तपासले असता भाग्यश्रीचा पतीच तिथे गाडी लावताना दिसून आला. त्यामुळे पोलीसांनी पतीच्या घरी जाऊन पाहणी केली असता भाग्यश्रीचा मृतदेह आढळून आला. तिच्या मानेवर आणि पायावर चाकुने वार केल्याचे निशाण होते. त्यानंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत असून, पोलीस संशयित फरार आरोपी पतीचा शोध घेत आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.