
ब्रेकिंग! मोदींच्या मंत्रिमंडळात हे खासदारांना मिळणार मंत्रीपद
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, 'या' खासदारांना मिळणार मंत्रिपद? कधी होणार विस्तार
दिल्ली – लोकसभा निवडणुका होऊन पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. तर दुसरीकडे बिहारमधील विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीपुर्वी मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातील खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रीय मंत्रिपदासाठी उत्सुक आहे, त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात यापैकी कोणत्या पक्षातील नेत्याची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक मंत्रिपद मिळू शकते. शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही एक मंत्रिपद दिले जाईल, असं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एकच जागा जिंकता आल्याने त्यांच्या पक्षाला राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवे असल्याने पवार गटाने मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. मात्र, यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळू शकतं, असा अंदाज वर्तवला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळीच्या वाटाघाटीत केंद्रात आणखी एका मंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला मिळू शकते, अशी चर्चा होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जर मंत्रिपद आले तर त्यासाठी त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यापैकी तीन टर्म मावळचे खासदार असलेले श्रीरंग बारणे व कल्याण डोंबवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पैकी कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर पहमगाम हल्ल्यानंतर काही बदल अपेक्षित आहेत. दुसरीकडे भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी एप्रिलअखेरीस नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे. देशभरातील भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होत असून जवळपास १५ राज्यातील प्रदेश अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी भाजपाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सध्या महाराष्ट्रातून भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे मंत्री आहेत. यात कोणाची भर पडणार की विद्यमानापैकी कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.