
बिहारमध्ये या पक्षाची येणार बहुमताने सत्ता
बिहार निवडणूकीचा धक्कादायक पोल समोर, मुख्यमंत्री म्हणून या चेह-याला पसंती?
पटना – या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. भाजपाप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी यांच्यात सरळ लढत होणार आहे. भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी सत्तेत येण्यास उत्सुक आहे.
बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपत आहे. पण त्यातच आता पोल येण्यास सुरुवात झाली आहे. पोल ट्रॅकरचा ताजा जनमत सर्वेक्षण समोर आले आहे. या पोलनुसार इंडिया आघाडीला (राजद, काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष) यांना ४४.२% मते मिळतील, तर एनडीएला ४२.८% मते मिळण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला २.७% आणि इतर लहान पक्षांना १०.३% मते मिळू शकतात. जागांचा विचार करायचा झाल्यास इंडिया आघाडीला १२६ जागा मिळू शकतात. तर एनडीएला ११२ जागा, जनसुराजला १ जागा आणि इतर पक्षांना ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या आधीच्या पोलमध्ये इंडिया आघाडीला १२१-१३१ जागा मिळतील आणि एनडीएला १०८-११५ जागांचा अंदाज वर्तवला होता. परंतु मतदानास अजूनही दोन-तीन महिने शिल्लक आहेत ज्यामध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील २०२० च्या निवडणूकीत राजदला ७५ भाजपाला ७४ जेडीयू ४३ काँग्रेसला १९ हिंदुस्तान अवाम मोर्चाला ४ जागा मिळाल्या आणि विकासशील इन्सान पार्टीला ४ जागा मिळाल्या होत्या.
बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी राजद नेते तेजस्वी यादव हे ४३% लोकांच्या पहिल्या पसंती म्हणून उदयास आले आहेत, तर फक्त ३१% लोक विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात. ९% लोक जनसुराजचे प्रशांत किशोर यांना पाठिंबा दिला आहे.