पुणे जिल्ह्यात खुनाचा थरार! दिराने केली भावजयीची निर्घृण हत्या
हत्येमागचे धक्कादायक कारण समोर, पळून जाताना आरोपी दिराचाही मृत्यू
पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातून एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील आंबळे येथे कौटुंबिक वादातुन सावत्र भावाने आपल्या भावावर आणि भावजयीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. यात भावजयीसह आरोपीही ठार झाला.
या बाबत मुलांचे वडील बाळासाहेब पोपट बेंद्रे यांनी शिरूर पोलिस स्टेशनला आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. थोरला मुलगा सुनिल व सून प्रियांका पुण्यामध्ये आयटी कंपनीत सर्विसला आहेत. 1 मे रोजी ते लंडनला जॉबसाठी जाणार होते. तसेच दुसरा मुलगा अनिल हा पुणे येथे कंपनीत काम करत होता. मात्र, त्यांच्या वागण्यामुळे तीन कंपन्या त्याला बदलाव्या लागल्या. पण नंतर आरोपी अनिल याला काम मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरु होते. जॉब गेल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. यामुळेच त्यांच्या कुटूंबात वाद सुरू होते. तो आपला जाॅब जाण्याला वडिलांना जबाबदार ठरवत होता. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी वडील बाळासाहेब बेंद्रे यांनी मुलगा सुनील व सून प्रियांका यांना घटनेच्या दिवशी गावाला आंबळे येथे बोलविले होते. जेवण केल्यानंतर प्रियांका व सुनील हे घराच्या टेरेस वरती झोपले होते. याचवेळी आरोपी अनिलने दोघांवर जोरदार चाकूहल्ला केला. ज्यामध्ये भावजय गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात वार केल्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील याला पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन दुचाकीवरुन पळुन जात असताना रस्त्यात एका कारला दुचाकीची धडक होऊन आरोपी अनिल बेंद्रेचाही मृत्यु झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल यांची तब्बेत गंभीर असुन त्यांच्या छातीवर चाकुचे वार असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारींच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करत आहेत.