
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचे एन्काऊंटर होणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक दावा, या कारणामुळे व्यक्त केली शंका?
बीड – बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. त्यानंतर केज न्यायालयाने त्याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली असून बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. पण माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
माध्यमांसोबत संवाद साधताना वडेट्टीवार यांनी एन्काऊंटरची शंका देखील बोलून दाखवली. ते म्हणाले की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो. मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठीचे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. याची माहिती एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकाला वाचण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटर करु नका. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी जर या छोट्या आकाचा वापर होत असेल तर हा पुरावा नष्ट करण्यासाठी काहीही होऊ शकते”, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान वडेट्टीवार यांनी याविषयी अधिक स्पष्टीकरण देण्याचे टाळले आहे. मात्र त्यामुळे वाल्मिक कराड याला दूर करून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी बीड प्रशासनावरही टीका करताना कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर भाष्य केले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी खंडणीच्या गुन्ह्यात हवा असलेला कराड मंगळवारी पुण्यात पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याला बीड जिल्ह्यातील केज येथील न्यायालयात हजर केले असता, त्याच दिवशी त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.